धरणगाव, रवींद्र महाजन/प्रतिनिधी – वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगातही अंधश्रद्धा आणि अनिष्ट कर्मकांडांना बाजूला सारून समाजजागृतीचा एक नवा आणि क्रांतीकारी आदर्श धरणगावातील वाघ परिवाराने घालून दिला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी पूर्णपणे ‘सत्यशोधक’ पद्धतीने पार पाडण्यात आला. विवेक, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे धरणगाव व परिसरातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महापुरुषांना अभिवादन आणि सोपी प्रार्थना
कार्यक्रमाची सुरुवात संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणून साधेपणा व मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीतींशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर एक सकारात्मक प्रभाव पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर.डी.महाजन यांनी केले.
१०० विद्यार्थ्यांना गणवेश अन् विचारप्रवर्तक ग्रंथांचे वाटप
या प्रसंगी राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्येच्या पवित्र स्मृतीला उजाळा देत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. दुःखाच्या क्षणी घेतलेल्या या समाजोपयोगी निर्णयाचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
याशिवाय, समाजात वाचनसंस्कृती आणि विवेकवादी विचार रुजावेत या उद्देशाने उपस्थित सर्व नागरिकांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक ग्रंथाच्या १०० प्रतींचे मोफत वितरण करण्यात आले.
मान्यवरांकडून वाघ परिवाराच्या परंपरेचा गौरव
पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात वाघ परिवाराच्या वैचारिक परंपरेचे कौतुक केले. स्व.जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीनुसार नेहमीच परिवर्तनवादी विचारांची कास धरली आहे, असे सांगत हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड.व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी.एम.पाटील, मा.गटनेते विनय भावे, कैलास माळी, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता, समाजाला एक नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





