मुंबई, प्रतिनिधी – राज्यातील पानपट्टी व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि शासनाच्या धोरणांविरोधात महाराष्ट्रातील पानपट्टी व्यावसायिकांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्यावतीने येत्या ७ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील पानपट्टी धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महासंघाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, या दिवशी राज्यातील पानपट्टी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवून सकाळी १० वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या
पानपट्टी व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासन तसेच इतर विभागांकडून होत असलेल्या कारवायांबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून, शासनाने संबंधित धोरणांचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई त्वरीत थांबवा
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येणाऱ्या कथित अन्यायकारक कारवाया तात्काळ थांबविण्यात याव्यात.
सुगंधी तंबाखूवरील बंदी उठविण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. पानपट्टीधारकांवर होणाऱ्या बेकायदेशीर व त्रासदायक कारवायांना आळा घालावा. पानपट्टी व्यवसायाला इतर लघुउद्योगांप्रमाणे शासकीय सवलती व आर्थिक मदत मिळावी.
पान दुकानदारांच्या कुटुंबातील किमान एका सदस्याला शासकीय अथवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्याचा विचार करावा. राज्यातील लाखो पान व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आदी मागण्या याप्रसंगी करण्यात येणार आहेत.
लाखो व्यावसायिकांच्या सहभागाची अपेक्षा
महाराष्ट्रात सुमारे १० लाखांहून अधिक पान व्यावसायिक असून, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या कोट्यवधींच्या घरात असल्याचा दावा महासंघाने केला आहे. त्यामुळे या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पानपट्टीधारक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
पानपट्टी व्यवसायाशी निगडित प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत, या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा आणि व्यावसायिकांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील पानपट्टी धारकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले आहे.





