धरणगाव, प्रतिनिधी – शहरात सध्या इंडियन गॅस प्रशासनाचा मनमानी आणि अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. गॅस सिलिंडरची गरज असताना ग्राहकांना सिलिंडर मिळण्याऐवजी त्यांच्या हक्काची नोंदणी कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर ‘ऑटो कॅन्सल’ (रद्द) केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस प्रशासनाच्या या मुजोर आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आघाडीच्या शिष्टमंडळाने शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली थेट धरणगाव तहसील कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.
शहरातील शेकडो ग्राहकांनी सिलेंडर साठी रीतसर बुकिंग करूनही त्यांना गॅस मिळत नसल्याच्या आणि ऑर्डर्स परस्पर रद्द होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे केल्या होत्या. यावर आक्रमक पाऊल उचलत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व रावेर लोकसभा-नंदुरबार संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील कार्यालयावर धडक दिली.
यावेळी शिष्टमंडळाने नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते आणि पुरवठा अधिकारी श्रीमती रेवणा कांबळे यांची भेट घेऊन गॅस नोंदणी अचानक रद्द होण्यामागचे सविस्तर स्पष्टीकरण मागितले. “कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांच्या ऑर्डर्स परस्पर रद्द करण्याचा अधिकार गॅस एजन्सीला दिला कुणी? सर्वसामान्यांच्या चुली विझवून हा कोणता कारभार सुरू आहे?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रशासनाला विचारला. तसेच शहरातील गॅस पुरवठा तात्काळ आणि सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, नगरसेवक लक्ष्मण माळी, सुनील चौधरी, परमेश्वर महाजन, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, किरण अग्नीहोत्री, युवासेनेचे विनोद रोकडे, रमेश चव्हाण, विलास पवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि संतप्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता यावर प्रशासन गॅस एजन्सीच्या मनमानीला कसा लगाम घालते आणि जनतेला दिलासा देते, याकडे संपूर्ण धरणगाव शहराचे लक्ष लागले आहे.





