जळगाव, प्रतिनिधी – जिल्ह्याच्या उंबरठ्यावर एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आध्यात्मिक सुवर्णक्षण येऊन ठेपला आहे. ‘मी आहेच तुम्ही सत्कर्म करत रहा’ या श्री स्वामी सखा महाराजांच्या अभय वचनाची साक्षात प्रचिती देणारे, संपूर्ण भारतभूमीतील पहिले आणि एकमेव असे अलौकिक ‘श्रीराम दरबार, १२ मारुती आणि सप्तचिरंजीव’ महामंदिर धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे साकारले आहे. या भव्य मंदिराचा आणि मूर्तींचा दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या १४ ते १७ जून दरम्यान संपन्न होत असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
पोखरी तांडा येथील श्री स्वामी महाराज सेवाश्रम मंडळ यांच्या वतीने ‘सकल जनहिताय, सखलजन सुखाय’ या उदात्त हेतूने हा विशाल प्रकल्प उभारण्यात आला आहे. २०१७ साली श्री सद्गुरू स्वामी सखा यांनी स्थापित केलेल्या श्री गुरुपद्म उपासना स्थानाच्या पवित्र भूमीत हे मंदिर उभे राहिले असून, येथील गोपद्म गोशाळा आणि परिसरातील १००० वृक्षांची हिरवाई या क्षेत्राचे पावित्र्य अधिकच वाढवत आहे.
मंदिराची थक्क करणारी अलौकिक वैशिष्ट्ये
भारतीय अध्यात्म आणि वास्तुकलेचा अजोड संगम असलेल्या या महामंदिराची विशेष वैशिष्ट्ये अशी आहेत…
देशातील पहिले ‘१२ मारुती’ मंदिर
आनंद रामायणातील नवव्या मनोहर खंडातील वाल्मीक ऋषींच्या वर्णनानुसार, भारतात प्रथमच एकाच ठिकाणी १२ नावांनी काळ्या पाषाणातील १२ मारुतींची स्थापना होत आहे.
सप्तचिरंजीवांची अद्वितीय स्थापना
मानवी शरीरातील सप्तचक्रांच्या आधारावर सप्तचिरंजीवांची प्रतीकात्मक स्थापना करणारे हे देशातील एकमेव मंदिर ठरणार आहे.
ब्रह्मांडीय ऊर्जेचे विशेष ‘हनुमान यंत्र
गर्भगृहाच्या मध्यभागी ५ बाय ५ फूट आकाराचे तांब्याच्या नळीतील प्रबळ ‘हनुमान यंत्र’ स्थापित केले जाईल. या यंत्राला मुख्य श्रीराम कळसाची तार आणि तिथून सर्व मूर्तींना जोडणारी ‘अर्थिंग तार’ जोडून एक परिपूर्ण अध्यात्मिक ‘ऊर्जा-सर्किट’ तयार केले आहे. यामुळे ब्रह्मांडातील ऊर्जा थेट गर्भगृहात प्रवाहित राहील व भाविकांना चैतन्याचा अनुभव येईल.
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती
मंदिराचे आणि १८ x ४० फुटांच्या भव्य सभामंडपाचे निर्माण हे नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराच्या आकर्षक ‘पागोडा शैलीत’ करण्यात आले आहे.
१३ कोटी रामनामाचा पाया
बारा मारुतींच्या मूर्तीखाली भक्तांनी लिहिलेला तब्बल १३ कोटी राम नामाचा जप स्थापित करण्यात आला आहे. यासाठी दररोज रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत भाविकांचा सामूहिक जप अखंड सुरू असतो.
मंत्रांचे चैतन्य व सहस्र जलकुंभ
मुख्य श्रीराम दरबाराच्या खाली ‘११,००० ओम नमः शिवाय’ तर गायत्री देवीच्या मूर्तीखाली ‘११,००० गायत्री मंत्र’ स्थापित करून मंदिराचा पाया ऊर्जावान केला आहे. तसेच, मंदिरात कमळाच्या आकाराचा २१ हजार लिटर क्षमतेचा भव्य जलकुंभ असून, त्याच्या मध्यभागी पंचमुखी गायत्री देवीची विलोभनीय मूर्ती स्थापित होत आहे.
५४ फुटी धर्मस्तंभ आणि भव्य कळस
मंदिरात ५४ फूट उंचीचा गगनचुंबी ‘धर्म स्तंभ’ आणि ‘धर्म ध्वज’ उभारला जात आहे. मुख्य कळसावर पशुपतीनाथ भगवानांची प्रतिकृती असलेला ५१ किलो वजनाचा व ५ फुटांचा पितळी कळस आणि त्यावर १५ फूट उंचीचा भगवान शंकराचा त्रिशूल विराजमान होणार आहे.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या अलौकिक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा अनेक पिढ्यांतून एकदाच लाभतो. परिसरातील सर्व आबालवृद्ध आणि भाविक कुटुंबांनी या भगवत कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हावे आणि १४ ते १७ जून दरम्यान पोखरी तांडा येथे अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी महाराज सेवाश्रम मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री.रामचंद्रजी (भ्रमणध्वनी – ९२७२३३२०८०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





