अमृतसर, वृत्तसंस्था – ऑपरेशनि ब्लू स्टारच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर (चौक मेहता) येथील दमदमी टकसालच्या मुख्यालयात आयोजित धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईचा तीव्र निषेध करताना महाजन यांनी ६ जून १९८४ चा दिवस हा “काळा दिवस” होता, असे संबोधले. तसेच या कारवाईदरम्यान सैन्याचा प्रतिकार करताना ठार झालेल्यांचा उल्लेख त्यांनी “शहीद” असा केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शीख विभाजनवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या कार्यक्रमाला राज्य सरकारचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिलेच मोठे मंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. रामेश्वर नाईक हेही उपस्थित होते.
इंदिरा गांधींच्या निर्णयावर आणि काँग्रेसवर घणाघात
व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना गिरीश महाजन म्हणाले, “६ जून हा आपल्यासाठी काळा दिवस आहे आणि आम्ही तो कधीही विसरू शकत नाही. ज्या पद्धतीने आपल्या हजारो भाऊ-बहिणींना यात हौतात्म्य आले, ज्या प्रकारे आपल्या पवित्र स्थळावर लष्कराने हल्ला केला, ते वेदनादायी आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील या पवित्र स्थळी बळजबरीने लष्कर घुसविले आणि निष्पाप लोकांना अत्यंत क्रूरपणे मारले गेले.”
पुढे बोलताना त्यांनी या घटनेची तुलना थेट १८ व्या शतकातील अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर तीव्र प्रहार केले. “हजारो निष्पाप लोक मारले गेले, पण कोणालाही फाशी झाली नाही, कोणाला शिक्षा झाली नाही. काँग्रेस आज त्यांच्या याच पापकर्माची किंमत मोजत आहे आणि म्हणूनच देशातील जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे,” असेही महाजन म्हणाले.
महाराष्ट्राकडून शीख समाजासाठी घोषणा
हा राजकीय कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट करत महाजन यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारने शीख समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. नवी मुंबई येथे १,००० कोटी रुपये खर्चून गुरु तेघ बहादूर यांच्या नावाने रुग्णालय आणि कॉलेज उभारण्यात आले असून, महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात गुरु तेघ बहादूर यांच्या जीवनावरील धड्याचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पंजाबमधील तरुणाईला अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शीख धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत, परंतु पुढील वर्षी मी त्यांना स्वतः सोबत घेऊन येथे येईन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.





