वराड, ता.धरणगाव, (दिलीप पाटील) – लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी परतणाऱ्या नववधूच्या आनंदावर काळाने घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळ बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास क्रूझर गाडीचे चालत्या गाडीतून चाक निघाल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून, एका सुखी कुटुंबाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकात झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वाघडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता. लग्नानंतर ती आपल्या नातेवाईकांसह पहिल्यांदाच माहेरी अकोल्याला परतत होती. संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. बुधवारी (२८ एप्रिल) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांची क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळून जात होती.
अचानक चालत्या गाडीचे एक चाक निखळले. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.
मृतक व जखमींची माहिती
या हृदयद्रावक घटनेत नववधू पूजा रवी वाघडकर (वय २२, नववधू), दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२), जगदीश चंद्रभान वाघडकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यात एका बालकाचाही समावेश आहे. जखमींची नावे अशी, प्रेम भारत वाघडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७), अंश नितेश काटोडे (१४).
स्थानिक नागरिक अन् पोलिसांची धाव
अपघाताचा आवाज ऐकताच वराड खुर्द येथील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परिसरात हळहळ
लग्नाचा मांडव अजून तसाच असताना आणि हातावरची मेहंदी सुकण्यापूर्वीच नववधूचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने वाघडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह अकोला परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





