धुळे, प्रतिनिधी – खान्देशातील जननेते, स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार कै. चुडामण आनंदा पाटील यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘अजिंक्य’ या जीवनचरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा उद्या, शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबईतील नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध टाटा थिएटर, एनसीपीए येथे संपन्न होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्याचे उद्घाटन आणि पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते तथा एफटीआयआयचे माजी अध्यक्ष अनुपम खेर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक सौरभ शुक्ला उपस्थित राहणार आहेत.
राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती
’अजिंक्य’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्याच्या मंत्रिमंडळातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, यात प्रामुख्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आ. अमरीशभाई पटेल, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे, संजय सावकारे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, आ. श्रीमती चित्रा वाघ यांचा समावेश आहे.
संघर्षातून घडलेल्या असामान्य व्यक्तित्वाची गाथा
कै. अण्णासाहेब चुडामण पाटील यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, चळवळ आणि जनसेवेने व्यापलेला होता. एक खंबीर जननेते आणि स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच असामान्य आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाची गाथा ‘अजिंक्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमंत्रक विनय रोहिदास पाटील आणि कुणाल रोहिदास पाटील यांच्यासह श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




