मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे त्यांचे विशेष अभिष्टचिंतन केले आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या अफाट कार्यशैलीने आणि मनमिळावू स्वभावाने जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी ४ जून २०२६ रोजी पाठवलेल्या या अधिकृत पत्रात ना. गुलाबराव पाटील यांच्या कामाचा गौरव केला असून त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.
जल जीवन मिशनचे काम झपाट्याने पूर्ण
उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात ना. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील कामगिरीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. “राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपण करीत असलेले कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. विशेषतः ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’चे काम अतिशय झपाट्याने पूर्ण होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्या प्रशासकीय गतीचे कौतुक केले आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आणि गौरवद्गार
लोकाभिमुख नेतृत्व: ना. गुलाबराव पाटील यांचा मनमिळावू स्वभाव, प्रेम, आपुलकी, स्नेह यासोबतच कामातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
कामाची जिद्द: लोकहितार्थ एखादे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.
पायाभूत सुविधांवर भर: ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
नवनवीन संकल्पना: त्यांच्या माध्यमातून विभागासंबंधी नवनवीन संकल्पना आणि लोकोपयोगी उपक्रम आगामी काळातही राबविले जातील आणि हा विभाग अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
”जनसेवेची आपली ऊर्जा अखंड अशीच कायम राहो,” अशी सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात आणि खान्देशात ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.





