प्रा.बी.एन.चौधरी
धरणगाव – पेट्रोल, डिझेलची टंचाई दिवसेंदिवस आक्राळविक्राळ स्वरुप धारण करत असून पेट्रोलपंपावर ग्राहकांची जीवघेणी गर्दी वाढत आहे. शेतकऱ्यांचे हे कामाचे दिवस असून त्यांना ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. यासाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डबे, कॅन, टाक्या रांगेत लावून नंबर लावले आहे. दिवसभर थकलेल्या अश्या शेतकऱ्यांना येथील पवार पेट्रोलपंप संचालक चंदन दिलिपराव पाटील यांनी माणुसकीच्या संवेदनेतून रात्रीच्या भोजनाची पेट्रोलपंपवरच व्यवस्था केली आहे. पेट्रोल घ्यायला आलेले शेतकरी, ग्राहक पंक्तीत खिचडीचा आस्वाद घेत पेट्रोलपंप संचालकांना धन्यवाद देत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले पेट्रोल, डिझेल बचतीचे आवाहन सर्वदूर पोहचले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. काही पंप बंद झाले आहेत तर काही पंपावर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. यातून वादविवाद, अरेरावी, विसंवाद, वितंडवाद, मारामाऱ्या यांचे दर्शन घडत आहे. असाच गर्दीचा प्रकार शहरातील चोपडा रोडवरील पवार पेट्रोलपंपवरही दिसून आला. डिझेल साठी ग्राहकांनी भर उन्हात आपल्या डब्यासंह रांगा लावल्या आहेत. वाट पाहून पाहून संध्याकाळ झाली तरी ग्राहक जागा सोडायला तयार नव्हते. डिझेल टॅकर रात्री उशिरा येईल अशी सूचना कर्मचाऱ्यांनी देऊनही ग्राहक जागा सोडायला तयार नव्हते. जेवणाची वेळ झाली तरी ते तेथेच ठाण मांडून बसले होते. शेवटी पेट्रोल पंपाचे संचालक यांनी माणुसकीच्या भावनेतून सर्वांसाठी खिचडीचा बेत आखला आणि सर्व शेतकरी ग्राहकांची पेट्रोल पंपावरच पंगती बसल्या. संचालक त्यांना आग्रहाने वाढत होते आणि शेतकरी बंधू आनंदाने भोजनाचा आनंद घेत होते. संचालकांच्या या छोट्याश्या कृतीतून त्यांनी माणुसकीचे अलौकीक दर्शन घडविल्याची चर्चा शेतकरी बांधव आपसात करत होते. व्यवसाय करायलाच हवा. मात्र, तो करतांना ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.! असे प्रतिपादन संचालक डि. जी. पाटील यांनी व्यक्त केले. या घटनेची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि अन्नदाता सुखी भव.! ही भावना प्रत्येकाच्या ओठी आली.





