(अभिष्टचिंतन / भरत चौधरी / ७४९८९४९२०१)
ज्यांच्या एकाच आहिराणी भाषणाने सोशल मीडियावर मिलियन लाईक्स आणि शेअर्सचा विक्रम नोंदवला आणि याच भाषणाच्या जोरावर ज्यांनी धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निर्विवाद वर्चस्व मिळविले. न भूतो न भविष्यती असा विजय मिळविला. त्या धरणगावचा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाताई सुरेश चौधरी यांचा आज वाढदिवस. सोज्वळ व्यक्तिमत्व, नेत्रदीपक कर्तृत्व आणि अमोघ वक्तृत्वाच्या धनी असलेल्या सौ. लिलाताई म्हणजे धरणगाव शहरातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांचे पती सुरेशनाना चौधरी हे धरणगाव नगरीचे भाग्यविधात्यांमधील एक. त्यांनी धरणगावात कापूस उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि हे शहर जगाच्या नकाशावर कापूस नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरेश नाना चौधरी आणि त्यांचे सुपुत्र निलेश चौधरी यांनी दोघांनी धरणगाव नगरीचे नगराध्यक्षपद भूषवले असून सौ. लिलाताई चौधरी यांच्या निवडीने त्यांच्या घरात नगराध्यक्षपदाची हॅट्रिक झालेली आहे. दैवकृपेने धन, दौलत, मान, संपत्ती खूप मिळाले असून आता फक्त गावाचा विकास आणि जनतेची सेवा हाच ध्यास ! हेच आपल्या उर्वरित कार्याचे ध्येय असल्याचे सौ. लिलाताई सांगतात.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या सौ. लिलाताई चौधरी या सुरेशनाना चौधरी यांच्या कुटुंबात आल्या आणि त्यांच्या पावलाने घरात लक्ष्मी नांदू लागली. अनेक कापूस मिल, ऑइल मिल, कृषी उत्पन्न बाजार समिती यात प्रगती करून या चौधरी कुटुंबाने धरणगाव शहरात संस्कार, नैतिकता आणि विनम्रतेचा आदर्श निर्माण केला आहे. घरात सुबत्ता असूनही या घरातील कोणत्याही माणसाला आपल्या श्रीमंतीचा गर्व नाही. ही शिकवण सौ. लिलाताई चौधरी यांनी घरातील प्रत्येक सदस्याला दिली आहे. स्वतः धार्मिक कार्यात आनंद शोधणाऱ्या लीलाताई घरात येणाऱ्या राजकारण्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची हसतमुखाने उठबस करत असत. हे करतांना त्यांनी सहज राजकारणाचे धडे गिरवले. राजकारणात येण्याचा कोणताही त्यांचा हेतू नसताना त्यांनी धरणगाव नगर परिषदेमध्ये आपले नशीब अजमावून पाहिले. एकदा अपयश आले. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांना मिळालेले प्रचंड यश, हे चौधरी परिवाराच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश मानले जात आहे.
यश मिळाले की माणूस त्या यशाने हवेत तरंगायला लागतो. मात्र, अध्यात्माची बैठक असलेल्या सौ.लीलाताई चौधरी यांनी आपले पाय जमिनीपासून दूर जाऊ दिले नाहीत. निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या विरोधकांच्या पक्षप्रमुख असलेल्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि दिर भावजयच्या नात्याला सुखद उजळणी दिली. निवडणूक संपली निकाल लागला त्याच दिवशी निवडणुकीतील यशापया संपले, आता दोघांनी धरणगावच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करुया असे साकडे त्यांनी ना. पाटील यांना घातले. त्याला तितक्या दिलदार पद्धतीने ना. गुलाबभाऊंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि धरणगावात सकारात्मक राजकारणाचे नवीन पर्व सुरू झाले. यातून सौ.लीलाताई चौधरी यांच्यातील विवेकवादी, मुत्सद्दी आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची ओळख जनमानसात निर्माण झाली. निवडून आलेले नगरसेवक हे कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांना धरणगावच्या नागरिकांनी निवडून दिले आहे. त्या सर्वांपेक्षा मी वयाने मोठी असल्याने मी अधिकारवाणीने त्यांना एकत्र आणून धरणगावच्या विकासासाठी प्रयत्न करायला भाग पाडेल, असं त्या अधिकाराने सांगतात. त्यांच्या बोलण्यात कोणताही स्वार्थ नसतो. त्यांच्या वागण्यात कोणतीही लबाडी नसते आणि त्यांच्या समर्पणाला कसलीच तोड नाही. त्यामुळे सर्व नगरसेवकांनाही त्यांच्या प्रति आदरयुक्त प्रेमभाव आहे.
धरणगाव शहरातील नगरपालिकेत निकालानंतर त्रांगडे निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदी लीलाताई चौधरी असल्या तरी त्यांच्याकडे पाहिजे ते बहुमत नाही आणि विरोधी पक्षाकडे जास्त नगरसेवक असले तरी त्यांच्याकडे नगराध्यक्षपद नाही. त्यामुळे धरणगाव नगरपालिकेचा गाडा चालवायचा असेल तर दोघांनी एकमेकांच्या सोबत राहूनच तो चालवता येऊ शकतो, ही भूमिका त्यांनी सगळ्यांना पटवून दिली आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या या भूमिकेला जाहीर व्यासपीठावरून मान्यता दिलेली आहे. धरणगाव नगरपालिकेत नगराध्यक्षपदावर बसताना मी मातृत्वाच्या भावनेतून साऱ्यांकडे बघते. त्यामुळे कुणी जवळचा आणि कुणी दुरचा असा भेदभाव मानत नाही. कोणताही पक्षपात करण्याचा माझ्या हातून कधीही प्रमाद घडणार नाही. साऱ्यांकडे मी समान नजरेने बघेल आणि हे बघत असताना धरणगाव शहराचा विकास कसा होईल हेच माझे मुख्य लक्ष असेल, असे त्या मानतात.
बहुमत नसलेल्या नगरपालिकेत नगराध्यक्षपद सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. वरवर ही खुर्ची कितीही मानाची असली तरी तिला किती काटे आहेत ? हे त्या खुर्चीवर बसणाराच जाणू शकतो. असे असले तरी आपण आपल्या परीने, आपल्या क्षमतेने जे जे शक्य होईल ते सारे करण्याचा प्रयत्न करु. धरणगावकरांनी दिलेला कौल मोठ्या मनाने मान्य करु आणि सामूहिक सकारात्मकतेचा आदर्श जळगाव जिल्ह्यापुरताच नव्हे तर संपूर्ण राज्यात घालून देऊ, असा आशावाद ते व्यक्त करतात. ना. गुलाबराव पाटील हे मला लहान दिरासारखेच आहेत. पूर्वी आम्ही एकाच पक्षात होतो. ते राजकारण करत होते तेव्हा मी त्यांच्यासाठी भाकरी देखील थापलेल्या आहेत. आता त्यांची मोठी वहिनी म्हणून त्यांनी मला नगरपालिकेसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचा शब्द दिलेला आहे. तो ते पूर्ण करतील याची मला खात्री आहे. त्यांनी देऊ केलेल्या सहकार्याने धरणगाव नगरपालिकेचा कायापालट करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणतात. त्यांच्या या आशा, अपेक्षांना यशाची सुगंधी फुले लागो आणि विकासाची रसाळ फळे येवोत. धरणगावकरांच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण होवोत, हीच सर्वसामान्य जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
© भरत चौधरी.
७४९८९४९२०१





