धरणगांव, प्रतिनिधी – दिवसभर ढगाळ वातावरण असतांना संध्याकाळी ४.३० – ५ वाजे दरम्यान धरणगाव शहरात आणि तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळ वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने शेतातील पीकं जमिनीवर लोळली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतशिवारात उभी असलेली डौलदार पीकं पाहणारा शेतकरी क्षणार्धात उध्वस्त झाला. लुटला गेला. हा घाला अवचित कसा आला म्हणत तो स्वतःच्या नशिबाला बोल लावत होता. शेतात उभी असलेली पीकंच नष्ट झाल्याने हंगामच हातातून गेल्याच्या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
तालुक्यात सर्वत्र गारपीट, वादळासह अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावखेड्यातून नुकसानिच्या बातम्या येत आहेत. कापणीच्या तोंडावर आलेली पिके या अवकाळी पाऊस व वादळामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा, केळी, पपई, बाजरी व मका या सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बुडत्याला काडीचा आधार मिळावा, यासाठी शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी कळकळीची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
गावात दहा मिनिटं वादळाचा धुमाकूळ होता. माणसाला माणूस दिसत नव्हता. सर्वत्र धुराळा पसरुन अंधार दाटला होती. वीज तारा तुटून प्रवाह खंडीत झाला. धाब्यांवरील पत्रे, दार, खिडक्या तुटून हवेत उडत होत्या. काही मिनिटात गावात भिंतीचे वातावरण पसरले होते.
धरणगाव तालुक्यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्या त्या भागाची पाहणी करून ताबडतोब गाव पातळीवरील तलाठ्यांना आदेश देऊन पंचनामा करून शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळून द्यावी अशी मागणी अशी मागणी तालुक्यातील आदर्श शेतकरी गट तसेच शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
धरणगाव तालुक्यातील या अवकाळी संकटाची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट दिल्लीतून जिल्हाधिकारी श्री.घुगे यांच्याशी संपर्क साधून नुकसानीच्या भरपाईचे आदेश दिले आहेत.
प्रतापराव पाटलांनी केली चौकशी :
घटनेनंतर माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ विविध गावांशी संपर्क करुन नुकसानीचा आढावा घेतला. तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला प्राथमिक आर्थिक अंदाज नोंदविण्याच्या सूचना दिल्या.
गुलाबराव वाघ यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांशी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी संवाद साधला. शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी धरणगाव तहसीलदारांना फोन करून त्वरित पंचनामे करून शासनस्तरावर नुकसान भरपाई मिळावी मागणी केली.





