नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ देत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या विनंतीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील आदेश ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, बीएलओंकडून घरोघरी भेटी घेण्याचा कालावधी आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानंतर मतदान केंद्रांचे पुनर्गठन १७ ऑगस्ट रोजी करण्यात येईल. मतदार यादीचा मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.
मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
आयोगाने राज्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बदललेल्या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी सर्व माध्यमांतून करण्याच्याही सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत.





