धरणगाव, प्रतिनिधी – ३० मार्च, सोमवार दुपारी १२.३० वाजेची वेळ. धरणगावात एक दुःखद वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बोरगाव शिवारात एक कार अपघात झाला आणि त्या अपघातात अविनाश चौधरी याचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त ऐकणाऱ्या प्रत्येक धरणगावकरांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कारण अविनाश हा अत्यंत येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा कुशल आणि धाडसी चालक होता. धरणगावकरांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, प्रत्येकाच्या हाकेला विनम्रतेने होकार देणारा, जेष्ठ, वडिलधाऱ्यांना स्वतःहून विनम्रतेने नमस्कार करणारा, मधुरभाषी अविनाश आता आपल्यात नाही यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. बघता बघता घटनास्थळी माणसांची गर्दी जमली. अनेक उलट्यामारुन गाडीचा पार चक्काचूर झाला होता. ग्रामीण रुग्णालय माणसांनी तुडुंब भरले. एका कुशल चालकाचा त्याच्याच गाडीत दुर्दैवी मृत्यू व्हावा ही नियतीची विडंबनाच होती. अविनाशच्या कुटुंबियांवर संकटाचा पहाडच कोसळला. सारा गाव दुःख सागरात बुडला. अविनाशच्या आठवणीत अविनाशला शोधू लागला.
घटना घडली त्या दिवशी त्याच्या एका मित्रासोबत तो जळगावी जाणार होता. ते टाळून तो घरी परतला. अविनाशच्या मुलाचा त्याच दिवशी, त्याच वेळी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा कार्यक्रम होता. पत्नी, मुलाला शाळेत सोडले. आई, पत्नी, मुलगा थांबा म्हणत असतांनाही न थांबता तो कारने त्याच्या कामाला निघून गेला. रस्त्यात अविनाशचे वडील रसवंतीवर रस घेत होते. त्यांनी अविनाशला रस घेण्याचा आग्रह केला. तो टाळून तो पुढे निघून गेला आणि काही मिनिटात हा अपघात घडला. अविनाशला मृत्यूने तिनदा संकेत दिले. मित्र, आई, पत्नी, मुलगा, वडिल यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अविनाशला हे संकेत कळले नाहीत. नियतीने आपले काम केले आणि अविनाशला आपल्या सोबत नेले.
२०२० साली मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने हात पसरायला सुरवात केली. लॉकडाऊन जाहिर झालं. टिंगल, टवाळी, विनोद करणारे आता कोरोनाला घाबरु लागले होते. अश्यातच घरणगावातही कोरोना रुग्ण सापडू लागले. आणि शहरावर भितीचे सावट पसरले. जो तो आपल्या जीवाला जपू लागले. दवाखान्यात वाढ होवू लागली. रुग्णाची ने आण सुरु झाली. एकेकजण आपल्या जीवाला जपत होता. अश्या संकटटकाळी एका रुग्णवाहिकेचा चक्रधर अविनाश चौधरी आपल्या जीवाची पर्वा न करता धावत होता. धरणगाव, धुळे, औरंगाबाद नाशिक आणि मुंबई अश्या अनेक फेऱ्या त्याने केल्या. त्याने ३०० कोरोना रुग्ण नेले. ३ हजारावर सॅम्पलची ने आण केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून. अशा या कोरोना योध्द्यासाठी काळ थोडाही थांबला नाही. तो क्रूर झाला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अविनाश काळाच्या पडद्याआड गेला. नऊ महिने स्वतःचं आरोग्य सांभाळत इतरांचं आरोग्य जपणाऱ्या हा योध्दा साक्षात मृत्यूशी लढत होता. रुग्णाला यमराजापासून दूर नेणारा हा योध्दा यमराजासोबत निघून गेला. त्याच्या आई, वडिल, पत्नी आणि मुलांना पोरकं करुन. त्यांच्या दुःखाला पार नाही. अविनाशने खूप मोठा धोका दिला असं आज ते म्हणतात.
अविनाश हा येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक संजय वामन चौधरी आणि माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभा संजय चौधरी यांचा मोठा मुलगा. आयटीआय इलेक्ट्रीशीयन शिक्षण घेवून त्याने ड्रायव्हिंगही शिकली होती. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ठेकेदारी पध्दतीने १०२ वर चालक म्हणून तो लागला. प्रसुतिच्या केसेस नेणारी १०२ बघता बघता कोराना रुग्णवाहिका झाली. दवाखान्यात जायलाही लोक घाबरत होती तेव्हा हा निधड्या छातीचा योध्दा अंगावर एकावर एक कोविड किट चढवून रुग्णांना गाडीतून वाहत होता. कुणाला मदतीचा हात देत होता, कुणाला हातांवर उचलून गाडीत ठेवत होता. नातेवाईक सुरक्षीत अंतर ठेवत होते तेव्हा अविनाश रुग्णांना पाणी पाजत होता. जेवू घालत होता. ऑक्सीजन लावत होता. अविनाशसी बोलतांना रुग्ण आणि त्याचे नातेवाईक जणू देवदूताशी बोलत होते. अविनाशमध्ये ते ‘देवरुप’ पहात होते. कोराना झालेल्यांची लोक हेटाळणी करत होते. तेव्हा अविनाशच त्यांना आधार वाटायचा. वीस, पंचवीस वर्षाचा अविनाश घरातून बाहेर पडे तेव्हा त्याचा एक वर्षाचा मुलगा तनय त्याच्याकडे झेपवायचा. मात्र, माया मनात ठेवून तो घरातून बाहेर पडे. परत सुरक्षीत येणार की नाही याची शास्वती नसतानाही पत्नी सौ. दिपालीचा हसून निरोप घेई. आणि कोरोना महामारीच्या महासागरात स्वतःला झोकून देई. न घाबरता. न डगमगता. दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी, स्वतः च्या जीवाची बाजी लावे. घरचे घाबरायचे नाहीत कां? असं विचारलं तेव्हा अविनाश म्हणाला आई, वडील, पत्नी यांची खंबीर साथ होती म्हणूनच मी हे करु शकलो, असं तो सांगायचा.
या काळात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गिरीश चौधरी, डॉ. अभय गोधणे, डॉ. मोगे बारेला, लॅब असिस्टंट हरीष पाटील, रामदास महाले यांनी अविनाशचं भरभरुन कौतुक केलं होतं. आज मागे वळून पाहतांना धरणगावकरांना अविनाश क्षणोक्षणी आठवतो. चौकाचौकात, गल्लीबोळात त्याची मित्रमंडळी, त्याच्या मदतीने भारावलेली माणसं अविनाशच्या आठवणीत डोळ्यात अश्रू आणून सद्गदीत होतात. मृत्यूला जवळून पाहणारा हा चक्रधर साक्षात मृत्यूच्या हातात हात घालून, कुणालाही मदतीची संधी न देता निघून गेला.
रात्री स्मशानभूमीत अविनाशला निरोप द्यायला न भूतो न भविष्यती अशी गर्दी उफाळली होती. त्याचा गोतावळाच मोठा होता. त्याचा स्वभाव गोड होता. ही त्याचीच पावती होती. त्याचं जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं. उदास करुन गेलं. अनेकांना रडवून गेलं. पद, पैसा, श्रीमंतीने जी लोकप्रियता मिळवता येत नाही ती श्रीमंती अविनाशने मिळवली होती. अविनाश आज शरिराने आपल्यात नाही. मात्र, अल्पायुषात त्याने केलेल्या सत्कर्मानी तो अनेकांच्या मनात घर करुन गेला. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो हीच त्या नियत्यांकडे प्रार्थना…!





