जळगाव, प्रतिनिधी – “जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीचे प्रकरण केवळ एका अभियंत्यापुरते मर्यादित नसून, या भ्रष्टाचाराची साखळी थेट मंत्रालयापर्यंत आणि छत्रपतींच्या वारसदारांपर्यंत गुंफलेली आहे,” असा खळबळजनक आरोप जळगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत, छत्रपतींचे वारसदार सुद्धा लाचखोरीचे समर्थक निघाल्याची अत्यंत गंभीर टीका शिवराम पाटील यांनी यावेळी केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची लबाडी आणि संशयास्पद भूमिका
पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवराम पाटील यांनी सांगितले की, जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता योगेश अहिरे यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ९ तारखेला रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर अहिरे यांना तीन दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, या प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवराम पाटील यांनी केला.
शिवराम पाटील यांनी पुढे सांगितले की, या घटनेनंतर जेव्हा ते अधीक्षक अभियंत्यांना भेटले, तेव्हा त्यांनी १५ तारखेला बोलताना ‘मला १४ तारखेपर्यंत या प्रकरणाची काहीच माहिती नाही’ असे सांगून हात वर केले. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणात चोरी आणि लाचखोरीसोबतच लबाडीचीही कमाल केली गेल्याचे शिवराम पाटील यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या मुख्य अभियंत्यांकडूनही उडवाउडवीची उत्तरे
अधीक्षक अभियंत्यांच्या या भूमिकेनंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण १८ तारखेला नाशिक येथील मुख्य अभियंता औटी यांची भेट घेतली, असे शिवराम पाटील यांनी सांगितले. मात्र, मुख्य अभियंत्यांनीही ‘मला १५ तारखेपर्यंत काहीच माहीत नाही’ असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शिवराम पाटील यांनी उघड केले. “चोर तो चोर आणि वरून लाचखोर, इतके लबाड अधिकारी या विभागात ठाण मांडून बसले आहेत,” असा संताप शिवराम पाटील यांनी व्यक्त केला.
छत्रपतींच्या वारसदार मंत्र्यांकडून निराशा; कारवाई शून्य
अधिकारी स्तरावर दाद न मिळाल्याने अखेर आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली, अशी माहिती शिवराम पाटील यांनी दिली. शिवराम पाटील यांनी सांगितले की, शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या छत्रपतींचे वारसदार असल्याने ते या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन इमानदारीने आणि कडक कारवाई करतील, अशी मोठी आशा आम्हाला होती. पण दुर्दैवाने या मंत्र्यांनीही भ्रष्टाचारी अभियंत्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा थेट आरोप शिवराम पाटील यांनी केला.
”राजवाड्यात राहणारे मंत्रीही बोगस निघाले”
पत्रकार परिषदेत बोलताना शिवराम पाटील पुढे म्हणाले की, आपण सर्वजण छत्रपतींचा आदर्श मानतो. परंतु, जे छत्रपतींच्या इस्टेटचे लाभार्थी आहेत आणि छत्रपतींच्या राजवाड्यात राहतात, ते शिवेंद्रसिंहराजे भोसले सुद्धा या प्रकरणात बोगस निघाले आहेत. शाखा अभियंता योगेश अहिरे हा या भ्रष्टाचारात एकटा नसून, ही लाचखोरांची साखळी थेट मंत्री महोदयांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यात छत्रपतींच्या वारसदारांचाही समावेश आहे, असे शिवराम पाटील यांनी शेवटी ठासून सांगितले.





