धरणगाव, रवींद्र महाजन – तालुक्यातील अनोरे गावामध्ये सामाजिक परिवर्तनाची एक नवी पहाट पाहण्यास मिळाली. येथील माळी समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रमेश तुकाराम महाजन आणि हरी तुकाराम महाजन यांच्या मातोश्री निसर्गवासी लाडकाबाई तुकाराम महाजन यांच्या दुःखद निधनानंतर, त्यांचा गंधमुक्ती व उत्तरकार्याचा (दशपिंड) कार्यक्रम कोणत्याही जुन्या रूढी-परंपरांना किंवा कर्मकांडाला थारा न देता, अत्यंत साध्या आणि ‘सत्यशोधक’ पद्धतीने पार पाडण्यात आला.
अनोरे गावाच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रांतिकारी आणि प्रबोधनात्मक प्रयोग ठरला आहे. महापुरुषांच्या विचारांना वंदन आणि सत्यशोधक प्रार्थना
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक कर्मकांडांऐवजी राष्ट्रनिर्माते, संत, महापुरुष आणि महामातांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. सत्यशोधक विधीचे मुख्य विधीकर्ते शिवदास महाजन यांनी उपस्थितांना सत्यशोधक समाजाची मूळ प्रार्थना म्हणून दाखवली आणि या संपूर्ण विधी मागील वैज्ञानिक व मानवी दृष्टिकोन समजावून सांगितला.
शोषणमुक्त समाज निर्माण करणे हीच खरी आदरांजली
याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी अत्यंत रोखठोक आणि प्रबोधनात्मक विचार मांडले. ते म्हणाले, ‘बहुजन समाजाने आता तरी अंधश्रद्धा, अवाजवी खर्च आणि मानसिक-आर्थिक शोषणास कारणीभूत ठरणाऱ्या कर्मकांडापासून मुक्त झाले पाहिजे. सत्यशोधक विचारांची कास धरून समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज आहे. समाजात समता आणणे आणि शोषणमुक्त वातावरण तयार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. निसर्गवासी लाडकाबाई महाजन यांना हीच खरी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची आदरांजली ठरेल.’ याप्रसंगी माजी मुख्याध्यापक एम.एच.चौधरी आणि माजी सरपंच भगवान महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त करून निसर्गवासी लाडकाबाई महाजन यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
ग्रंथभेट आणि वृक्षारोपणाने दिला नवा संदेश
हा कार्यक्रम केवळ एका विधीपुरता मर्यादित न राहता, त्यातून समाजाला एक नवा आदर्श घालून देण्यात आला. सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार आणि सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमात उपस्थित सर्व पित्रांना (नातेवाईक व ग्रामस्थांना) महापुरुषांचे अनमोल विचार असलेले ग्रंथ आणि सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली.
याशिवाय, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘भामरे परिवारा’च्या वतीने शेतात व परिसरात लिंब, पिंपळ आणि वड या दीर्घायुषी वृक्षांचे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. मृत्यूनंतरही पर्यावरणाची जपणूक करण्याचा हा संदेश उपस्थितांचे डोळे उघडणारा ठरला.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या पुरोगामी आणि आदर्श कार्यक्रमाला अनोरे गाव व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी हजेरी लावली होती. यामध्ये गावाचे ज्येष्ठ नागरिक मधुकर देशमुख, आर.टी.आय.चे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघ, सरपंच स्वप्निल महाजन, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, वि.का.सो. चेअरमन ज्ञानदेव पाटील, रमेश गुरुजी, लक्ष्मण महाजन, पत्रकार कल्पेश महाजन, राजेंद्र महाजन, जितेंद्र महाजन, मनोहर महाजन, भगवान महाजन, दगा महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनोरे गावाने कर्मकांडाला फाटा देत सुरू केलेली ही ‘सत्यशोधक’ परंपरा संपूर्ण धरणगाव तालुक्यासाठी आणि बहुजन समाजासाठी एक दीपस्तंभ ठरेल, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.





