धरणगाव, प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील नागदुली-म्हसावद परिसरात भरधाव पिकअप व्हॅनने दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. शेतात कपाशीची लागवड करून घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत भगवान नामदेव पाटील (वय ६०) व सिंधुबाई भगवान पाटील (वय ५५) या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागदुली-म्हसावद येथील रहिवासी असलेले भगवान पाटील व त्यांच्या पत्नी सिंधुबाई पाटील हे शेतातील कपाशी लागवडीचे काम आटोपून दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास टीव्हीएस लुना दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. नागदुली गावापासून एक किलोमीटर अंतरावर असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, सिंधुबाई पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या भगवान पाटील यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेमुळे नागदुली, म्हसावद आणि धरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. शेतमजुरी व कष्टाच्या जीवनातून संसार उभा करणारे हे दाम्पत्य एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, मयत सिंधुबाई पाटील या धरणगावचे माजी नगरसेवक स्वर्गीय मधुकर बन्सी रोकडे यांच्या मोठ्या भगिनी होत्या. तसेच भगवान पाटील हे धरणगाव येथील रहिवासी संजय दीपचंद महाजन यांचे मामासासरे होते. त्यामुळे या दुर्घटनेची बातमी समजताच धरणगाव परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे.
मयत दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्काळजी आणि भरधाव वाहनचालकाच्या बेफिकीरपणामुळे दोन जीवांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
कपाशीची लागवड केली… पण घरी पोहोचण्यापूर्वीच काळाने घातला घाला!
शेतात दिवसभर कष्ट करून संसारासाठी घाम गाळणारे भगवान पाटील आणि सिंधुबाई पाटील हे दाम्पत्य आपल्या घराकडे परतत होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. घराच्या अवघ्या काही अंतरावर असताना भरधाव पिकअपने त्यांचा संसारच उद्ध्वस्त केला. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे – भरधाव वाहनांचा बेजबाबदार वेग आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?





