धरणगाव, रवींद्र महाजन –
पिंपरी चिंचवड (पुणे) येथे विषारी अवैध ‘कोथरी’ (थैली) दारू पिल्याने तब्बल १९ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना, धरणगाव शहर आणि तालुक्यात मात्र या घटनेतून कोणताही धडा घेतला गेल्याचे दिसत नाही. धरणगाव परिसरात ‘कोथरी’ म्हणून ओळखली जाणारी ही जीवघेणी अवैध दारू राजरोसपणे विकली जात असून, ही विषारी थैली स्थानिक तरुणाईसाठी थेट मृत्यूचे आमंत्रण ठरत आहे.
तरुण पिढी उद्ध्वस्त, माता-भगिनींचा आक्रोश
धरणगाव शहरासह ग्रामीण भागातील अनेक तांड्यांवर आणि गल्लीबोळांत या अवैध दारूची विक्री सुरू आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण या ‘कोथरी’च्या आहारी गेले आहेत. परिणामी, अनेक हसते-खेळते संसार धुळीस मिळाले असून, वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांची तरुण मुले गंभीर आजारांना बळी पडून मृत्यूच्या शय्येवर पोहोचत आहेत. घरातील कमावता तरुण दारूच्या विळख्यात अडकल्याने अनेक माता-भगिनींवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
पिंपरी चिंचवडसारख्या दुर्घटनेची वाट पाहतंय का प्रशासन?
पिंपरी चिंचवडमधील घटना ही मानवनिर्मित आपत्ती होती. तशीच छुपी परिस्थिती सध्या धरणगाव तालुक्यात निर्माण झाली आहे. या अवैध कोथरी दारूमध्ये कुठली रसायने वापरली जातात, याची कोणतीही खात्री नसते. ही दारू कधीही विषारी बनून धरणगावात मोठी जीवितहानी घडवू शकते. तरीही स्थानिक पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. धरणगावातही अशीच एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
जनतेची तीव्र कारवाईची मागणी
या जीवघेण्या व्यवसायाला पाठीशी घालणारे पांढरपेशा चेहरे आणि मुख्य विक्रेते यांच्यावर मोक्काअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. केवळ किरकोळ गुन्हे दाखल करून या समस्येचे उच्चाटन होणार नाही.
नागरिकांची प्रतिक्रिया
“आमच्या डोळ्यांदेखत तरुण मुलांचे आयुष्य बरबाद होत आहे. ही कोथरी दारू तात्काळ बंद झाली पाहिजे. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून धरणगाव तालुका ‘अवैध दारूमुक्त’ करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
आता पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती धरणगावात होऊ द्यायची नसेल, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून धरणगाव शहर व तालुक्यातील अवैध दारूचे अड्डे समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा, या मृत्यूच्या सुळसुळाटाची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागेल, हे नक्की.





