धरणगाव (प्रतिनिधी) – हिंदू धर्मात आध्यात्मिक आणि आरोग्य दृष्ट्या गोपालन, गोसेवा आणि गोसंवर्धनाला खूप महत्व असून ज्योतीदेवी गो-सेवा आश्रम गोपालनाचे कार्य करुन खूप मोलाचे काम करत आहे, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद डहाळे यांनी केले. येथील हेरिटेज वाॅक गृपच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित गो-शाळा भेटीच्या उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गो-शाळेचे संस्थापक, उद्योजक जिवनआप्पा बयस होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी गृपचे संयोजक जैनेंद्र जैन यांनी हेरिटेज वाॅक गृप राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी यांनी गो-शाळेची सविस्तर माहिती देतांना गोपालनासंदर्भात आश्रमात राबविण्यात येत असलेल्या गो-सेवा, गो-संवर्धन आणि गो-वंश वृध्दीचे कौतुक केले. गायींची निगा आणि व्यवस्था या ठिकाणी सेवा भाव म्हणून केली जाते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कमलेश तिवारी यांनी ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असा गौरवपूर्ण उल्लेख केला. व्यवस्थापक मुकेश बयस यांनी आपल्या स्व. वहिनींच्या नावे गो-आश्रम सुरु केला असून, सध्या आश्रमात ५० ठेलारी, गीर, देशी गायी आणि १० वासरं असल्याची माहिती दिली. या सर्व गायी आश्रमाला दान म्हणून मिळाल्याचे सांगितले. यातील काही गायी-वासरं तर कासायाच्या दारातून परत आल्याचे त्यांनी सांगितले. यातील बहुतांशी गायी भाकड असल्या तरी त्यांच्या सेवेतून पुण्य लाभते असे ते म्हणाले. नियोजित जागा अपूर्ण पडत असल्याने लवकरच आश्रमाचा विस्तार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जिवनआप्पा बयस यांनी गायींची सेवा करायला मिळते, ही माझी पूर्व जन्माचे संचीत आणि मायबापाची पुण्याई असल्याच्या भावना व्यक्त केली. गो-आश्रमाला शासनाचे कोणतेही अनुदान नसून सारी सेवा वैयक्तिक व दानशूर लोकांच्या सहकार्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सर्वांनी लक्ष्मीमाता मंदिर व बालकवी स्मारकाला भेट दिली.
कार्यक्रमाला गोशाळेचे अध्यक्ष जीवन सिंग बयस, सचिव मुकेश बयस, खजिनदार दत्तात्रेय चौधरी, डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. सौ. पद्मिनी डहाळे, जैनेंद्र जैन, प्रा.बी.एन.चौधरी, कमलेश तिवारी, राजेंद्र पुरभे, कडू महाजन, विवेक लाड, सुधाकर विसावे, मुकेश तिवारी, राहुल जैन, सुभाष जैन, सखाराम महाजन, लोकेश चौधरी, दामोदर महाजन, राजेंद्र लोहार, कपिल चव्हाण, प्रीतम बायस, राहुल चव्हाण, निखिल बायस, जितेंद्र बायस, सतीश गायकवाड, वनराज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाय.डी.महाजन यांनी तर आभार प्रदर्शन राहूल जैन यांनी केले.





