धरणगाव, रवींद्र महाजन- अंमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांचे दागिने आणि पाकिटे लंपास करण्याचे सत्र सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, महिला भाविकांनी सोन्याचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २४ एप्रिल रोजी अंमळनेर-जळगाव बसने मंगळग्रह दर्शन घेऊन परतणाऱ्या काही महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्या. ही बाब टाकरखेडा जवळील सती माता मंदिराजवळ लक्षात आल्यावर भाविकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. बस अंमळनेर पोलीस स्टेशनला नेण्यात आली, परंतु तेथे प्रवाशांची तपासणी न करताच बस सोडून देण्यात आली. ज्या महिलांचे दागिने चोरीला गेले, त्यांना दोन-तीन तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवल्यानंतर केवळ संपर्क क्रमांक घेऊन घरी पाठवण्यात आले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह:
या घटनेबाबत पी. एम. पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “तक्रारदार महिलांना दोन-तीन तास थांबवूनही त्याच वेळी तक्रार लिहून का घेतली गेली नाही? दुसऱ्या दिवशी केवळ सहीसाठी लांबून येणाऱ्या महिलांना पुन्हा बोलावणे कितपत योग्य आहे? चोरीमुळे आधीच त्रस्त असलेल्या महिलांना अशा प्रकारे पोलीस स्टेशनच्या चकरा मारायला लावणे अन्यायकारक आहे.”
पी. एम. पाटील यांनी केलेल्या मागण्या केल्या आहेत
अंमळनेर बस डेपो आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, चोरी झाल्यास बाहेरून येणाऱ्या भाविकांची तक्रार तात्काळ नोंदवून घेऊन त्यांना योग्य वागणूक मिळावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, भाविकांना त्रास देणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या प्रतिनिधींसह जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार असून, अंमळनेर पोलिसांना योग्य आदेश देण्याची मागणी करणार आहे. भाविकांनीही प्रवास करताना स्वतःच्या सामानाची आणि दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.





