धरणगाव, भरत चौधरी – राजकारण… या शब्दाभोवती अनेकदा सत्तेची समीकरणं, कुरघोडी आणि स्वार्थाची वलयं असतात. या गढूळ पाण्यात अनेकदा भरडला जातो तो तळागाळातील ‘निष्ठावान कार्यकर्ता’. नेता मोठा होतो, सत्तेच्या सोपानावर चढतो, पण ज्याच्या खांद्यावर चढून तो तिथे पोहोचतो, तो कार्यकर्ता मात्र अनेकदा अंधारातच राहतो. ‘वापरून फेकून देणे’ ही राजकारणातील अलिखित रीत मानली जाते. पण जळगाव जिल्ह्यातील धरणगावच्या मातीत एक वेगळंच, माणुसकीचं आणि कृतज्ञतेचं राजकारण पाहायला मिळालं. हे उदाहरण आहे हेमू चौधरी या एका सामान्य चहावाल्याचं आणि त्याला सावरणारे युवा नेतृत्व प्रताप पाटील यांचं.
हेमूची निष्ठा: जिथे पक्ष आणि उमेदवारापलीकडे फक्त ‘नेता’ होता
धरणगावच्या कोट बाजारात चहाची टपरी चालवणारा हेमू चौधरी. त्याच्या हाताच्या कडक चहाचा घोट घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. पण हेमूची ओळख फक्त ‘चहावाला’ एवढीच मर्यादित नाही. तो पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रताप पाटील यांचा असा एक शिलेदार आहे, ज्याला आदेशाची गरज पडत नाही. निवडणूक नगरपालिका, ग्रामपंचायतीची असो वा लोकसभा-विधानसभेची, हेमू आपला गल्ला, आपला व्यवसाय आणि आपला प्रपंच विसरून प्रचाराच्या मैदानात उतरतो. त्याच्यासाठी उमेदवार कोण? चिन्ह काय? हे गौण असतं. “गुलाबभाऊ आणि प्रतापभाऊ म्हणजेच माझा पक्ष” ही त्याची साधी आणि सरळ निष्ठा. या निष्ठेपोटी त्याने अनेकदा भरघोस धंदा होणारे दिवस प्रचारासाठी खर्च केले. निवडणुकीच्या काळात आपली टपरी बंद ठेवून, घसा कोरडा पडेपर्यंत घोषणा देत हेमू गल्लोगल्ली फिरला.
अर्थिक संकटाची भीषण लाट आणि कोसळलेला संसार
पण निष्ठेची किंमत मोठी असते. सततच्या राजकीय सक्रियतेमुळे हेमूचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. जो चहाचा धंदा घराचा गाडा हाकत होता, तोच धंदा बसू लागला. उधारी वाढली, खेळते भांडवल संपले आणि संसाराचे गणित विस्कळीत झाले. त्यातच कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा डोंगर समोर उभा होता. व्याजाचे चक्र सुरू झाले आणि बघता बघता हेमूच्या आयुष्यात असा काळ आला की, ज्या व्यवसायाने त्याला ओळख दिली, तोच व्यवसाय – तीच दुकान, जागा त्याला विकावी लागली.
एका निष्ठावान कार्यकर्त्याचा संसार डोळ्यादेखत मोडून पडला. चहाची किटली हातातून सुटली आणि हेमू हताश झाला. राजकारणात ‘गिधाडां’ची कमतरता नसते; अनेकांनी त्याच्या या परिस्थितीवर टीका केली, तर काहींनी दुर्लक्ष केलं. पण अशाही स्थितीत हेमूची आपल्या नेत्यांवरील श्रद्धा तसूभरही ढळली नाही.
मच्छिंद्र (बुट्या) पाटील आणि प्रताप पाटलांचा मायेचा हात
अंधार दाटलेला असतानाच मदतीचा पहिला किरण मच्छिंद्र (बुट्या) पाटील यांच्या रूपाने आला. त्यांनी हेमूची तगमग पाहिली आणि त्याला जळगाव रोडवरील उड्डाणपुलाजवळ एक छोटीशी जागा उपलब्ध करून दिली. हेमूने पुन्हा एकदा जिद्दीने चहाची किटली हातात घेतली. नवीन जागा, नवीन सुरुवात, पण साधनसामुग्रीचा अभाव होता.
तालुक्यात येताना-जातांना प्रताप पाटील यांची नजर नेहमीच या छोट्या कार्यकर्त्यावर असायची. हेमूच्या चेहऱ्यावरच हसू आणि मनातली जिद्द त्यांनी ओळखली होती. उन्हाळा तीव्र होता, चहापेक्षा थंड पेयांची मागणी वाढत होती, पण फ्रिज नसल्यामुळे ग्राहक परत जात होते. हेमूची ही अडचण त्याने कधी बोलून दाखवली नाही, पण एका प्रताप पाटील यांच्या सारख्या संवेदनशील नेत्याच्या नजरेतून ती सुटली नाही.
अनपेक्षित भेट: जेव्हा नेत्याने शब्द न देता साथ दिली!
कुठलीही पूर्वकल्पना नाही, कुठलाही गाजावाजा नाही. अचानक एक गाडी हेमूच्या टपरीसमोर उभी राहते आणि त्यातून एक चकचकीत ‘डिप फ्रीज’ खाली उतरवला जातो. हेमू चक्रावून जातो, “मी तर हे मागवलं नव्हतं, मग हे आलं कुठून?” या प्रश्नाचं उत्तर त्या डिलिव्हरी बॉयने दिलेल्या पावतीत होतं. त्यावर नाव होतं – हेमू चौधरी.
”प्रताप भाऊंनी तुमच्यासाठी ही छोटीशी भेट पाठवली आहे,” हे शब्द ऐकताच हेमूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे केवळ एक मशीन नव्हतं, तर त्याच्या कष्टाची आणि निष्ठेची त्याच्या नेत्याने घेतलेली दखल होती. ज्या राजकारणाने संसार मोडला, त्याच राजकारणातील एका संवेदनशील हाताने आज पुन्हा तो संसार सावरण्याची उमेद दिली होती.
नवा विश्वास: ‘दहा हत्तींचे बळ’
आज हेमूच्या त्या छोट्याशा दुकानात शितपेयांची विक्री वाढली आहे. त्याची रोजची कमाई दुपटीने वाढली असून आर्थिक स्थैर्याकडे त्याची वाटचाल सुरू झाली आहे. हेमू आज अभिमानाने सांगतो, “माझ्या नेत्याने माझ्या पाठीवर हात ठेवला, आता मला कोणाचीच भीती नाही. जे गमावलंय, ते दुप्पट जोमाने कमावून माझ्या नेत्याला दाखवीन!”
निष्कर्ष:
धरणगावच्या या प्रसंगानं खान्देशातील राजकारणाला एक मोठा संदेश दिला आहे. कार्यकर्ता हा केवळ सतरंज्या उचलण्यासाठी किंवा गर्दी जमवण्यासाठी नसून, तो नेत्याच्या परिवाराचा एक घटक असतो. प्रताप पाटील यांनी एका कार्यकर्त्याला ‘आर्थिक स्थैर्य’ मिळवून देऊन खऱ्या अर्थाने त्याला सक्षम केलं आहे. कुसुमाग्रजांच्या ओळी आज हेमूच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा!
प्रताप पाटील यांची ही कृती केवळ एका कार्यकर्त्याला केलेली मदत नसून, ती निष्ठेचा सन्मान करणारी एक ‘संवेदना’ आहे.





