मुंबई, प्रतिनिधी – राज्यातील ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याने मतदार यादीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती राज्जियातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्याचबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनीही दि. १७ जुलै २०२६ रोजीच्या पत्राद्वारे विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्याची विनंती केली होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादी संगणक प्रणालीद्वारे डाउनलोड करण्यात आलेल्या प्रारूप याद्यांच्या अहवालानुसार राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ मोजक्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या तयार असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांची विनंती विचारात घेतली आहे. आयोगाने दि. १५ जुलै २०२६ रोजी जाहीर केलेल्या मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार दि. २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करावयाची प्रारूप मतदार यादी तूर्त प्रसिद्ध करू नये, असे निर्देश दिले आहेत.तसेच, याबाबतच्या सविस्तर सूचना तसेच सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मतदार यादीचा पूर्वनियोजित कार्यक्रम बदलला असून, २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न झाल्याने मतदार, राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना नव्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.





