धरणगाव, प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे, आपल्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वतःमधील कौशल्ये ओळखावीत, विषयांची योग्य व महत्त्वपूर्ण निवड करून विविध विषयांचे मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ. सुरेखा पालवे यांनी केले. येथील प. रा. हायस्कूल सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम. उषा अंतर्गत ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ.सुरेखा पालवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण कुलकर्णी होते. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील बदलांची आवश्यकता स्पष्ट करत या नव्या शिक्षण प्रणालीचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी व्यासपीठावर संचालक अजय पगारिया, नीनाताई पाटील, डॉ.कांचन महाजन, डॉ.विजयानंद वारडे, डॉ.संदीप पालखे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ.गुणवंतराव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या संधी, अधिक सक्षम शिक्षण प्रणाली उभारण्याचे मार्ग तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी व दीर्घकालीन टिकणारे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
डॉ.संदीप माळी यांनी रोजगाराच्या विविध संधींवर प्रकाश टाकत भाषेचे रोजगाराच्या अनुषंगाने असलेले महत्त्व स्पष्ट केले. उत्तम वाचन, लेखन आणि चिंतन म्हणजेच बहुश्रुततेचे महत्त्व सांगत सर्जनशीलतेच्या जोडीतून व्यावसायिकता कशी साध्य करता येईल हे त्यांनी स्पष्ट केले. भाषेचे सखोल ज्ञान असल्यास विविध स्पर्धा परीक्षांद्वारे तसेच जाहिरात लेखन, मुद्रितशोधन, अनुवाद व निवेदन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
डॉ.दीनानाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करतांना नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, सर्वसमावेशकता राखणे आणि तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.कुणाल इंगळे यांनी ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संदीप पालखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





