पाचोरा, सचिन सोमवंशी – ‘शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे,’ हा श्रद्धेय मोठे भाऊ भवरलालजी जैन यांचा विचार जपत, जैन इरिगेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे एक संवेदनशील उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे पोटच्या दोन्ही मुलांना औताला (नांगराला) जुंपण्याची वेळ आलेल्या कुराड खुर्द (ता. पाचोरा) येथील हतबल शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांना आज संस्थेच्या वतीने सुदृढ बैलजोडी, कडबाकुट्टी यंत्र आणि चार महिने पुरेल इतका किराणा देऊन एक मोठा सुखद दिलासा देण्यात आला.
जेव्हा पोटची मुले औताला जुंपली गेली…
पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द येथील ज्ञानेश्वर शहाणे या भूमिपुत्राची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. स्वतःची जमीन नसताना त्यांनी बटाईने शेती कसायला घेतली. मात्र, पेरणीचे दिवस आले तरी शेतात सरी पाडण्यासाठी ना बैलजोडी होती, ना ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी खिशात पैसे. शेती तर पडून ठेवता येत नव्हती. शेवटी हतबल झालेल्या या बापाने काळजावर दगड ठेवून आपल्या दोन्ही मुलांनाच औताला जुंपले आणि शेतात राबवून घेतले.
महिनाभरापूर्वी वार्ताहर सुनील लोहार यांनी वृत्तपत्रात या हृदयद्रावक प्रसंगाची बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी समोर येताच शेती आणि शेतकऱ्यांच्या आजच्या भीषण वास्तवतेचे चटके संपूर्ण समाजाला जाणवले.
उद्योजकाची सहृदयता: शब्दाला जागले ‘अशोकभाऊ’
ही बातमी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या वाचनात आली. अन्नदात्याची ही विदारक स्थिती पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱ्यांना या भूमिपुत्राला तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना दिली.
त्यानुसार, मागील गुरुवारी संस्थेच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शहाणे यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि त्यांना मदतीचा शब्द दिला होता. आज अगदी आठवडाभरातच दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यात आली.
शेतातच रंगला ‘तो’ भावनिक सोहळा
आज गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीने शहाणे परिवाराला साहित्य सुपूर्द करण्यात आले. यात सुदृढ बैलजोडीचा समावेश आहे. ज्यामुळे आता मुलांना औताला जुंपावे लागणार नाही. बैलांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून कडबाकुट्टी यंत्र आणि कुटुंबाला पुढील ४ महिने पुरेल इतका किराणा साहित्य भरून देण्यात आले.
आपल्या शेतात अचानक नवीन बैलजोडी आणि मदतीचा हात आलेला पाहून ज्ञानेश्वर शहाणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. एका गरजू शेतकऱ्याला संकटकाळात मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी आयुष्याला नवी उभारी देणारी ठरली.
मान्यवरांची उपस्थिती
शेतातच पार पडलेल्या या अत्यंत भावनिक प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे ट्रस्टी डॉ. सुदर्शन अय्यंगार, समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील, विक्रम अस्वार, प्रशांत सूर्यवंशी, जैन इरिगेशनचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, माजी जि.प. सदस्य संतोष चौधरी आणि ही भीषण परिस्थिती जगासमोर आणणारे वार्ताहर सुनील लोहार आदि उपस्थित होते.
कठोर परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी जेव्हा उद्योजक आणि संस्था अशा संवेदनशीलतेने उभ्या राहतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजातील अंधार दूर होतो, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.




