धरणगाव (प्रतिनिधी) : हेमगंगा परिवाराने कुमार थिएटरच्या माध्यमातून चित्रपट व्यवसायात ९० वर्ष दिली आहेत. आमच्या पाच पिढ्या या व्यवसायात मनापासून रमल्या. त्यांनी जनतेचे मनोरंजन केले. कुमार थिएटर आमच्यासाठी केवळ टाॅकिज नाही तर ते काशी, केदारनाथ, बद्रिनाथ सारखे एक तिर्थक्षेत्र आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख या थिएटरचे संचालक बाबाशेठ अर्थात रमेश रमणलाल भाटीया यांनी काढले. धरणगाव हेरिटेज वाॅक अंतर्गत समृध्द वारसा जागृती अभियानात ते बोलत होते. त्यांनी १९३७ ते आजतागायत या थिएटरच्या आठवणींचा पिटाराच उपस्थित सदस्यासमोर रिकामा केला. चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या भेटी, चित्रपटाचे रेकाॅर्ड, मिळालेली बक्षिसं हे सांगतांना त्यांचा उर दाटून आला. डोळ्यात अश्रू तराळले. आपले जीवन आज कृतकृत्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्वप्रथम गजानन महाराज आणि संत गुलाबबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संयोजक जैनेंद्र जैन यांनी आपल्या मनोगतातून हेरिटेज वाॅक गृपची संकल्पना, वाटचाल आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. समन्वयक प्रा. बी.एन.चौधरी यांनी कुमार टाॅकीज आणि भाटीया परिवाराशी निगडीत आठवणींना उजाळा दिला. आपल्या बालपणी या थिएटरला सोन्याचे दिवस होते असं सांगून त्यांनी हे थिएटर म्हणजे धरणगावचे हृदय होते असे नमूद केले. या थिएटरने व भाटीया परिवाराने स्वतः व्यवसाय तर केलाच सोबत अनेक छोटे-मोठे व्यवसाईकांना रोजगारही दिल्याचे त्यांनी नमूद केले.
गृपच्या वतीने बाबाशेठ भाटीया व त्यांचे सुपुत्र केवलभाई भाटीया, सौ. रश्मी भाटीया यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. भाटीया परिवारातील हेमलाल भाटीया, रमणलाल भाटीया, नवनीतशेठ भाटीया, जयंतीशेठ भाटीया, रमेशशेठ भाटीया ते आजच्या पिढीचे प्रतिनिधी केवल भाटीया यांनी या क्षेत्रात योगदान दिले केवल भाटीया यांनी अनेक दुर्मिळ, रंजक किस्से सांगून बैठकीत रंगत आणली. मोगले आझम, माहेरची साडी, संतोषी माता, हरि दर्शन, शोले, हम आपके है कोन या चित्रपटांनी हाऊसफूल थिएटरचे रेकाॅर्ड ब्रेक केल्याचे ते म्हणाले. आज प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने थिएटर चालवणे अशक्य झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. थिएटर म्हणजे हत्ती पोसणं आहे असं ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल जैन यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश तिवारी यांनी केले. या प्रसंगी विवेक लाड, कडूभाऊ महाजन, संजीव जैन, सुभाष जैन, वाय. डी. महाजन, रमेश पुरभे, सुधाकर विसावे, चिमणलाल जैन आदींची उपस्थिती होती. राहूल जैन यांनी सूत्रसंचालन केले तर मुकेश तिवारी यांनी आभार मानले. या उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून आली.





