धरणगाव, प्रतिनिधी – येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज पहाटे संपली. तिनं दिवसांपासून किटकनाशक प्राशन केलेला शेतकऱ्याला आज मृत्यूने गाठले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मोठा माळीवाडा परिसरातील रामायण मढी नजीक संजय मग्नन महाजन (वय-५३) हे बागायतदार शेतकरी होते. प्रचंड मेहनत करूनही दरवर्षी शेतीतून उत्पन्नच येत नसल्याने संजय महाजन यांनी सुरूवातीला खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले. व्याजाचा विळखा घट्ट होत असल्याचे लक्षात येताच संजय महाजनच्या वृध्द मातापिता, पत्नी आणि मुलांनी एकत्र बसून घरातील सोन्याचा ऐवज आणि शेतीचा काही तुकडा विकून लाखो रूपयांच्या कर्जाची फेड काही वर्षांपूर्वीच केली होती. यानंतर पिक कर्ज घेऊन संजय महाजन यांनी पुन्हा नव्या उमेदीने शेती सुरू केली. मात्र, नियतीने साथ दिली नाही आणि संजय महाजन यांच्याभवती कर्जाचा विळखा पुन्हा पडला. खाजगी सावकारांकडून कर्ज घेतल्याचा अनुभव वाईट असल्याने यावेळी संजय महाजन यांनी पतसंस्थेचे कर्ज काढून आपला संघर्ष सुरू ठेवला.
दरवर्षी आस्मानी संकटामुळे पिक उध्दवस्त होत असल्याने शेतीचा खर्च आणि उत्पादन यांचं गणित कधीच जुळले नाही. दरवर्षी मार्च महिन्यात कर्ज नवं जुनं करतांना संजय महाजन यांची जिवघेणी तगमग सर्वश्रुत होती. यंदाही याच विवंचनेत असलेल्या संजय महाजन यांच्या घरी तीनं दिवस आधी पतसंस्थेचे पथक कर्जवसुलीची नोटीस देऊन गेले आणि संजय महाजन यांच्या संयमाचा अंत झाला. हताश झालेल्या संजय महाजन यांनी शेतातच किटकनाशक प्राशन केले. त्यांना तात्काळ धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने संजय महाजन यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून संजय महाजन यांच्यावर उपचार सुरू होते. प्रत्येक क्षणाला संजय महाजन मृत्यूला हुलकावणी देत होते. मात्र, आज रविवारी (दि.८) पहाटे ४.३० वाजता संजय महाजन यांना मृत्यूने गाठले आणि जगण्याचा संघर्ष संपला. संजय महाजन यांच्या मृत्यूचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले. अविनाश आणि महेश या मुलांनी वडील संजय महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पदरी अपयशच पडलं. दुपारी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संजय महाजन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





