धुळे, प्रतिनिधी – महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीने हिरे भवन येथे ‘कर्मयोगी गाडगेबाबा’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे मुख्य समन्वयक ऍड.एन.एस.पाटील यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व वक्त्या डॉ. प्रा. रजंनी मुगंसे, निवृत न्यायधिश जे.टी.देसले, अतुल निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.के. पाटील, शाहीर परिषदेचे आप्पा खताळ, तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ, धुळे जिल्हा कलावंत विकास मंचचे जिल्हाध्यक्ष सुरेश चत्रे ,जेष्ठ नागरीक संघांचे उपाध्यक्ष अरविंद पाखले, एन.पी.वाणी, परिट धोबी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे, दिलीप गवळी, परदेशी धोबी संघटनेचे अध्यक्ष गणेश परदेशी, संत गाडगेबाबा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जेष्ठ संयोजक विजय मंगळे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रतील प्रसिद्ध युवा भारूडकार हम्मीद सय्यद (अहिल्यानगर) यांचा भारूडाचा कार्यक्रम व अमरावती येथील प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्तखंजीरी वादक पवन महाराज दवंडे यांचा प्रबोधनात्मक असा ‘कर्मयोगी’ गाडगे महाराज या सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला धुळेकरांच्या उदंड प्रतिसाद मिळाला. ‘गोपाला गोपला, देवकी नंदन गोपाला’च्या गजरात संपूर्ण हिरे भवन भारूडाच्या रंगी रंगुन गेले.
कार्यक्रम प्रसंगी धुळ्यातील जेष्ठ नागरिक संघ,परिट धोबी महासंघ, अखिल भारतीय शाहीर परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, खान्देश तमाशा परिषद, बालरंगभूमी परिषद, धुळे ऑर्केस्ट्रा कलाकार संघ आदी विविध संस्थांचे कलावंत, लोककलावंत मोठ्या संस्थेने उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक सिंध्दांत मगळे, मोहीत पाटील, सचिन महाजन, राहूल मंडळे, अरविंद पाटील, राजू गवळी, दिलीप हजारे, जगदीश सगरे, गणेश सगरे, खजिनदार संजय गवळी यांनी परिश्रम घेतले.





