धरणगाव, प्रतिनिधी – गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे धरणगाव तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील सर्व शेतपिके डोळ्यांदेखत करपून गेल्याने बळीराजा हवालदिल आणि उद्विग्न झाला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी धरणगाव तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी केले.
शासकीय निकषांकडे दुर्लक्ष, परिस्थिती अत्यंत गंभीर
निवेदनात नमूद केल्यानुसार, शासनाच्या नियमानुसार पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्यास तात्काळ आपत्कालीन उपाययोजना राबवणे बंधनकारक असते. मात्र, धरणगाव तालुक्यात परिस्थिती याहून अत्यंत विपरीत झाली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. निवेदनातील प्रमुख मागण्या अशा,
दुष्काळ जाहीर करणे- तालुक्यातील बिकट परिस्थिती पाहता धरणगाव तालुका तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करावा.
चारा छावण्या- पाण्याच्या व चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे गुराढोरांचे हाल होत असून, जनावरांसाठी तालुक्यात तातडीने चारा छावण्या उभारण्यात याव्यात.
गिरणा धरणाचे आवर्तन- गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी तातडीने एक आवर्तन सोडण्यात यावे.
रब्बी हंगामाचे नियोजन – आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर ५ आवर्तने सोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात यावी.
मोर्चाचा इशारा
प्रशासनाने येत्या १० दिवसांच्या आत या गंभीर मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास, तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, किरण अग्निहोत्री, जितेंद्र धनगर, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी, लीलाधर पाटील, नंदा पाटील, अरुण पाटील, गजानन महाजन, सुनील चव्हाण, प्रवीण पाटील, अक्षय मुथा, रियाझ बागवान, वसीम पिंजारी, प्रेमराज चौधरी, मेघनाथ ठाकरे, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, शरद शिरसाठ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




