धरणगाव, प्रतिनिधी – तालुक्यातील पष्टाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वारकरी वेशभूषेने वेधले लक्ष
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी मातेची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वारकरी पोशाख, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसराला आध्यात्मिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
रविंद्र महाराजांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
या कार्यक्रमासाठी गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांची उपस्थिती लावली. ह.भ.प. रविंद्र महाराज यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे महत्त्व, संत परंपरा तसेच आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षकांचे आयोजनासाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश निकम, तसेच शिक्षिका मिना पाथरे, रुपाली पाटील आणि भारती ठाकरे यांनी परिश्रम घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषा, अभंगगायन आणि दिंडी सोहळ्याबाबत मार्गदर्शन केले.
नामस्मरण व प्रसादाने सांगता
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विठ्ठल नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून दिंडी सोहळ्याची सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक होण्यास मोठी मदत झाली.





