धरणगाव, प्रतिनिधी – आपल्या लेखणीतून आणि खणखणीत शाहिरीतून शोषित, उपेक्षितांचा आक्रोश जगासमोर मांडणारे थोर समाजसेवक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धरणगाव येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील ‘मोठा माळी वाडा’ परिसरातील मातंग समाजाच्या वस्तीत असलेल्या अण्णाभाऊंच्या स्मारकाजवळ हा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी नगरसेवक लक्ष्मण माळी यांनी समस्त समाजबांधवांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाचे मुख्य पूजन माळी समाजाचे माजी सचिव दशरथ महाजन व माळी समाजाचे ज्येष्ठ पंच रावा महाजन यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव केला.
या अभिवादन सोहळ्याला परिसर व माळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कैलास महाजन, फकीरा जाधव, राजू जाधव, विजय जाधव, गजानन महाजन, आकाश महाजन, किशोर जाधव, कांतीलाल महाजन, भागवत महाजन, कैलास काका आणि प्रवीणभाऊ यांच्यासह बहुसंख्य समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली.




